बालगंधर्व यांचा जन्म १८८८ साली झाला. बालगंधर्व यांचे संगीताचे शिक्षण कै. पं. भास्करबुवा बखले व गोविंदराव टेंबे यांच्याकडे झाले. त्यांचे संपूर्ण नाव नारायण श्रीपाद राजहंस असे होते. त्यांची संगीत नाटकातील सुरुवात १९०५ साली किर्लोस्कर नाटक मंडळी मध्ये झाली. संगीत नाटकातील स्त्री भूमिका करण्यात त्यांचा हातखंडा होता.
भास्करबुवा व गोविंदरावांनी त्यांना नाट्यसंगीतास पूरक अशीच तालीम दिली. लहानवयातील त्यांचे गायन ऐकून लोकमान्य टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली. आवाजातील नैसर्गिक गोडवा व मुलायमपणा हा त्यांच्या स्त्री भूमिकांना पूरक ठरला. लयीचा अंदाज त्यांना जन्मजातच लाभला होता. आवाज पातळ असल्यामुळे तानाची फिरत अप्रतिम होती. परंतु आवाजाची तयारी दाखविण्यासाठी त्यांनी कधीही गायन केले नाही. उलट पद प्रभावी होण्यासाठी त्याचा खुबीने वापर केला. त्यांचे गायन ऐकण्यासाठी प्रामुख्याने लोक नाटकास जात व त्यांच्या आग्रहाने एकच पद तीन-तीन वेळा बालगंधर्वांना सादर करावे लागे. पदांची लय अतिविलंबित अथवा अतिद्रूत नसे. मध्यलयीन पदांचे गायन बालगंधर्व करीत असत. त्यांच्यामुळे संगीत नाटकाला चांगले दिवस आले व त्या काळाला नाट्यसंगीताचे सुवर्णयुग आणि त्यांच्या कारकिर्दीला गंधर्व युग असे संबोधले गेले.